पिठांचा व्यवसाय

मित्रांनो, निरनिराळ्या धान्यांची पिठे विकण्याच्या व्यवसायाच्या निमित्ताने मला तुम्हाला व्यवसायाचे एक सूत्र सांगायचे आहे. ते सूत्र असे आहे. “जी वस्तू तयार करणे सोपे असते ती वस्तू विकणे अवघड असते. आणि जी वस्तू तयार करणे अवघड असते ती वस्तू विकणे सोपे असते”.

या सूत्राचा अर्थ उलगडून सांगतो. जी वस्तू तयार करणे सोपे असते ती वस्तू अनेक लोक तयार करायला लागतात आणि अनेकांनी उत्पादन सुरू केले की बाजारात तिचा सुळसुळाट होतो. तो एवढा होतो की या वस्तूच्या विक्रीत स्पर्धा वाढते आणि ती विकणे अवघड होऊन बसते. उदाहरणार्थ, लोणची, मसाले, पापड हे तयार करणे काही फार अवघड नसते. त्यामुळे बाजारात अनेक प्रकारचे मसाले आलेले आपण पहात असतो. मग त्यांची विक्री करणे अवघड होते. याउलट खूप कलाकुसर करून तयार होणार्‍या काही वस्तू असतात. त्या तयार करणारे कारागीर कमीच असतात. त्यामुळे त्यांचे उत्पादन अवघड असते आणि अशा वस्तू तयार करणारे काही मोजकेच लोक बाजारात असतात. त्यामुळे त्या तयार करणार्‍या लोकांना विकण्यासाठी काही करावे लागत नाही.  त्यांच्याकडे ग्राहक आपणहून चालत येतात. म्हणजे विक्री सोपी असते. 


हा नियम पिठाच्या व्यवसायाला लागू आहे. कारण ज्वारी, गहू, बाजरी यांची पिठे तयार करणे काही अवघड नाही. आपल्या समाजात पूर्वी महिला आपल्या घरातच जात्यावर दळण दळत असत. एक जाते जमिनीत घट्ट रोवलेले आणि दुसरे त्याच्यावर फिरणारे. खालच्या जात्यावर धान्य ठेवून वरचे जाते फिरवले की, घासून पीठ तयार होते. हेच तंत्रज्ञान आहे. मात्र ही कामे यांत्रिकी पद्धतीने केली की, फ्लोअर मिल उभी राहते.


असे हे सोपे तंत्रज्ञान असल्यामुळे आणि पिठांसाठी लागणारा कच्चा माल स्थानिक बाजारात सहजपणे  उपलब्ध असल्यामुळे या व्यवसायात कोणीही शिरू शकतो. फारसे कौशल्य अंगी नसणारा कोणीही एखादी मोठी पिठाची गिरणी टाकून निरनिराळी पिठे तयार करतो आणि विक्रीचे जाळे तयार असेल तर ते पीठ बाजारात आणून विकू शकतो. त्यासाठी फार काही गुंतागुंतीची प्रक्रिया नाही.


म्हणजे बाजारात पिठांच्या बाबतीत सहज स्पर्धा होऊ शकतेे. पण फार स्पर्धा होते म्हणून हा धंदा करू इच्छनार्यानी फार निराशही होण्याची गरज नाही. कारण स्पर्धा फार असली तरी पिठांना मागणीही तशी प्रचंड असते. कारण पीठ हा नित्य लागणारा पदार्थ आहे. असे असले तरी पीठ विकणाऱ्यांने ते चांगले आणि कमी किंमतीत विकले पाहिजे हेच या क्षेत्रातल्या यशाचे रहस्य आहे.


स्वस्त पीठ विकताना कच्चा माल स्वस्तात मिळवणे फार आवश्यक आहे. कारण कच्चा माल स्वस्तात आणि चांगला मिळाला तरच पीठ चांगले आणि स्वस्तात विकणे शक्य होते. मोठ्या प्रमाणावर हा व्यवसाय करणार्‍या कंपन्या तर शेतकर्‍यांशी करार करून आपल्याला हवा तसा माल पिकवून घेतात आणि तो माफक दरात त्यांच्या बांधावर जाऊन उचलतात. आपल्या देशात कोणत्याही पिकाचा हंगाम असला की धान्य स्वस्तात मिळते आणि तेच धान्य नंतर त्या दराच्या दीडपट किंवा दुप्पटही भावाने घ्यावे लागते. तेव्हा वर्षभर लागेल एवढे धान्य स्वस्त असताना खरेदी करून साठवून ठेवले तर या धंद्यात भरपूर नफा मिळतो. मात्र वर्षाभराचे धान्य एकदाच खरेदी करण्याची ताकद असली पाहिजे. आपल्या देशात जशा गल्लोगल्ली पिठाच्या गिरण्या आहेत तशा गिरण्या अमेरिकेसारख्या प्रगत देशात नसतात आणि तिथल्या लोकांना गिरणीत जाऊन दळण आणत बसावे लागत नाही. तिथे किराणा मालाच्या दुकानांत पिठाची तयार पाकिटेच विकली जातात. त्यामुळे तिथे तयार पिठांना खूप मोठे ग्राहक आहे पण भारतात तसे नाही. शिवाय भारतात लोक आता आपल्यापुरती लहान सहान आटा चक्की खरेदी करून त्यावर आपल्याला हवे तेवढे पीठ घरीच दळून घ्यायला लागले आहेत. मात्र आता शहरीकरणही झपाट्याने होत असल्याने तयार पिठांची पाकिटे खरेदी करण्याची प्रथा आपल्याही देशात रूढ होत आहे. म्हणजे पुढच्या काळात या धंद्याला चांगली संधी आहे. 


पिठांची पाकिटे करून विकली जातात तेव्हा त्यांच्या किंमती धान्यापेक्षा कितीतरी जास्त असतात. म्हणजे या व्यवसायात नफ्याचे प्रमाण चांगले आहे. पिठांत साधारणत: गहू, ज्वारी किंवा बाजरी यांची पिठे मोठ्या प्रमाणावर विकली जातात. त्यातल्या गव्हाचे केवळ पीठच विकता येते असे नाही. गव्हाचा मैदा, रवा यांनाही चांगली मागणी असते. रवा, मैदा यांना घरगुतीही मागणी आहे आणि बेकरी व्यवसाय तसेच अन्न प्रक्रिया उद्योग यांना मैदा, रवा आणि मक्याच्या पिठालाही मागणी आहे. या सगळ्या उत्पादनांना परदेशातूनही मागणी येत असते.

या व्यतिरिक्त अनेक प्रकारची पिठे विकता येतात. इडली, उपवासाचे थालीपीठ अशा पदार्थांना काही विशिष्ट प्रकारची आणि मिश्रणांची पिठे लागतात. तीही तयार करून विकता येतात. बेसन पीठही मोठ्या प्रमाणावर विकले जाते. उपवासाला राजगिरा, भगर, शाबुदाणा यांचीही पिठे वापरली जातात आणि ती मिळाली तर आयती घेण्याची लोकांची तयारी असते. पुण्यात एक पीठे विकणारे उद्योजक आहेत. ते लागेल ते पीठ तयार करून देतात आणि निरनिराळी ५२ प्रकारची पीठे तयार स्वरूपात पॅक करून विकतात. त्यात शिंंगाड्याचेही पीठ असते. 


तसा पीठ हा प्रॉडक्ट साधाच आहे पण त्याला चांगली पॅकिंग करून विकले तर लोकांना हवे असतेआणि या व्यवसायात चांगल्या पॅकिंग सोबतच ताजे पीठ उपलब्ध करून दिले तर ग्राहकांचा विश्‍वास संपादन करता येतो आणि त्यातून नफा कमावता येतो. 
या व्यवसायात पाळावयाचे पथ्य म्हणजे स्वच्छता आणि त्या संबंधातल्या अन्न आणि औषध प्रशासनाकडून दिल्या जाणार्‍या परवान्यामागोमाग येणारे नियम पाळणे.


साधारणत: पाच ते सात लाखापासून ते काही कोटी रुपयांपर्यंत गुंतवणूक करून हा धंदा सुरू करता येतो आणि दरमहा कमीत कमी लाख रुपयांपासून दहा लाख रुपयांपर्यंत कमाई करता येतो. धंद्यात जम बसेपर्यंत काही अडचणी येतात पण एकदा बाजारात आपला ब्रँड पक्का रुजला की मात्र फार कष्ट न करता विक्री होते. 

डिजिटल मार्केटिंग

डिजिटल मार्केटिंग म्हणजे नक्की काय, त्याचा वापर का करावा आणि डिजिटल मार्केटिंग नक्की कुठे करावे हे तुम्हाला आधी समजून घ्यावे लागेल. पण कोण देईल याची अगदी सोप्या आणि समजेल अशा भाषेतील माहिती? काळजी करू नका. आम्ही आहोत ना. अनेक नवउद्योजकांना योग्य मार्गदर्शन उपलब्ध व्हावे या हेतूनेच ऑनलाईन व्यवसायातील आमच्या अनुभवी व तज्ञ मार्गदर्शकांनी अशा माहितीचे योग्य सादरीकरण आमच्या पोर्टलवर केले आहे.

अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लीक करा 

शेअर करा
error: Alert: Content is protected !!